मुख्य सामग्रीवर वगळा

कृषाग्रलेख : कापूसगोष्टी १ .

" कापूस " हा शब्द आणि पदार्थ बहुतेकांच्या जीवनात तेवढासा महत्वाचा नसेल. समईतील वात बनवण्यासाठी, कधी लागलं खुपलं तर , इंजेक्शन देताना वगैरे किंवा जखमेवर लावलेला , जुन्या उश्या गाद्यांमधून बाहेर आलेला कापूस. फार फार तर अत्तर लावून कानात कोंबून ठेवलेला आणि मयताच्या नाकात ठेवलेला कापूस. तो कापूस बनतो कुठे , कसा बनतो ह्यावर कधी आपण गांभीर्याने विचारच करत नाही. कापूस लागला तर तो घरात असतोच. एवढं काही महत्वाचा किंवा त्याच्या शिवाय घर चालू शकतच नाही अशी काही त्याची ख्याती अजून तरी नाही.तेव्हा थोडी कापसाची ओळख करून घेऊयात.




इंग्रजांनी १५० वर्षे भारताला पिळून काढले त्यात सर्वात महत्वाचे कारण होते कापूस. फुटबॉल प्रेमींची ओळखीची नावे असणारे लिव्हरपूल , मँचेस्टर किंवा लँकेशायर हि शहरे ज्यावर उभी राहिली तो म्हणजे कापूस. जगात पहिली औद्योगिक क्रांती झाली त्याचा कच्चा माल म्हणजे कापूस. अमेरिकेत शेतातील मजूरकामासाठी आफ्रिकेतून काळ्यालोकांचा व्यापार चालू केला गेला त्याचे कारण कापूस.



आज खनिज तेलाने जागतिक राजकारणात ज्याला हटवून आपले केंद्रस्थान बनविले आहे तो म्हणजे कापूस. जगातील एकूण लागवड क्षेत्रापैकी एक तृतीयांश क्षेत्र ज्या पिकाखाली आहे ते म्हणजे कापूस. गांधी-टिळक आदींनी  स्वदेशीची आग ज्यावर पेटवली तो म्हणजे कापूस. गांधीजींनी तर आज फॅशन म्हणून वापरल्या जाणाऱ्या खादी च्या नावे अख्खा देश एक केला त्याचे मूळ म्हणजे कापूस. ग्रामीण भारताच्या स्वावलंबन आणि स्वयंरोजगाराचे चिन्ह बनलेल्या चरख्याचा प्राण म्हणजे कापूस.



जगाच्या नकाशावरून थेट महाराष्ट्रात येऊन पहिले तर महाराष्ट्राच्या एकूण उत्पन्नामध्ये १८-२० टक्के वाटा देणारा कापूस. 36 जिल्ह्यांपैकी २२-२४ जिल्ह्यात घेतले जाणारे पीक म्हणजे कापूस. ह्या पैकी १३-१५ किंबहुना त्यापेक्षा जास्त जिल्ह्याची रोजची रोजी रोटी म्हणजे कापूस. मुंबई ज्या कापड उद्योगांच्या जीवावर मायानगरी बनली त्याचा कच्चा माल म्हणजे कापूस. १२ करोड लोकसंख्येपैकी ५-६ करोड जवळपास ५०% लोकसंख्येचा उरदनिर्वाह ज्यावर अवलंबून आहे तो म्हणजे कापूस. पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये प्रशासकीय अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या, शिक्षण घेणाऱ्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील लाखो विद्यार्थ्यांची फी भरणारा कापूस. महाराष्ट्रात ज्या पिकाखाली सर्वात जास्त क्षेत्र आहे तो म्हणजे कापूस.


कापसाबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे. भारतात अगदी ६००० वर्षे पूर्वीपासून कापूस शेती केली जाते असं म्हणतात. महाराष्ट्रात, आपल्या घरात आजोबांच्या काळापर्यंत जरी शोध घेतलात तर जवळपास सर्वत्र कापूसच केला जात होता. ऊस वगैरे सारखी नगदी पिके गेल्या काही वर्षांपूर्वी आली आहेत. कापूस जरी लागायला मऊ आणि वजनाला हलका असला तरी त्याचा प्रवास तेवढाच कठीण आणि गोष्ट तेवढीच महत्वाची आहे.

क्रमश : 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा